हायपेशिया!

 लोकसत्ता दिवाळी अंक(२०२०) मध्ये अंजली चिपलकट्टींचा हायपेशियावरचा एक लेख वाचला. लेख छानच आहे तो. त्यानंतर लगेचच आलेहांड्रे मिनाबार दिग्दर्शित आणि राचेल वाईझ अभिनित २००९ सालचा Agora (अगोराचा अर्थ होतो लोकांनी एकत्र येऊन चर्चा करण्याची जागा) हा सिनेमा पाहीला. चौथ्या शतकातील गणिततज्ज्ञ, खगोलशास्त्रज्ज्ञ 'हायपेशिया' जिला रोमन-इजिप्शियन ख्रिस्ती लोकांनी आलेक्झांड्रियात मारून टाकले होते. तिच्या जीवनावर आधारीत आधारित हा सिनेमा आहे. हायपेशियाबद्दल मी अच्युत गोडबोले यांच्या गणिती या पुस्तकात थोडं वाचलं होतं. पण त्या पुस्तकातील तपशील फार विस्तृत स्वरूपात नव्हते. चिपलकट्टींनी मात्र त्यांच्या लेखात हायपेशियावर विस्तृत लिहिलंय. 

     ग्रीक संस्कृतीचे मानवी जीवनावर असंख्य उपकार आहेत. ख्रिस्तपूर्व चारशे ते इ.स.चारशे या आठशे वर्षांच्या छोट्या कालखंडात या संस्कृतीत काय काय विद्वान लोक जन्माला येऊन गेले आहेत!  प्लेटो, साॅक्रेटीस, ॲरिस्टाॅटल, डेमाॅक्रिटस, अपोलोनिअस, युडोक्झस, युक्लिड, पायथागोरस, टाॅलेमी, अर्किमिडीज, अकॅडमस( अकॅडमी हा शब्द ज्याच्या नावावरून आला तो हाच!), आर्किटस, झेनो अशी किती किती नावं घ्यायची! गणित विज्ञानात फिनिक्स प्रमाणे भरारी घेणारा हा काळ होता. हे सर्व खरं असलं तरी स्रियांना मात्र यात कुठेही स्थान होतं असं फारसं आढळत नाही. स्त्रियांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळत आलेली आहे. ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात पायथागोरासची शिष्या थेओन ही गणितज्ज्ञ होती. थेओन ही जगातील पहिली स्री गणितज्ज्ञ. पुढे तिने पायथागोशीच लग्न केलं. ख्रिस्तानंतर चौथ्या शतकात ईजिप्तच्या आलेक्झांड्रीया या शहरात एक मोठे संग्रहालय होते. त्या संग्रहालयाचे अध्यक्ष होते हायपेशियाचेच वडिल थेओन द अलेक्झांड्रीया. या संग्रहालयात ख्रिस्तपूर्व टाॅलेमीच्या काळापासून  गणित, विज्ञानात केल्या गेलेल्या कामाचे दस्तऐवजीकरण केले गेलं होतं. हायपेशियाला गणित,तत्वज्ञान, खगोलशास्त्र या विषयात प्रचंड गती होती. गणित हा मानवी सत्याकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे असं तिला वाटत असे. अभ्यासकांचे असे मत आहे की टालेमीने केलेलं काम शोधण्यात हायपेशियाचा मोठा सहभाग होता.


      
साॅक्रेटीस जसा आपल्या स्काॅलामध्ये (यापासून पुढे स्कूल हा शब्द तयार झाला) लोकांना प्रश्न विचारण्यास उद्युक्त करायचा , विचार करण्यास भाग पाडायचा त्याच पद्धतीने हायपेशिया ही देखील अलेक्झांड्रीया च्या अगोरा मध्ये लोकांना शिकवत असे.  विचार करण्यास प्रवृत्त करत असे. इतकं करून सुद्धा ती म्हणत असे की, "मी सांगते म्हणून विश्वास न ठेवता तुमच्या बुद्धीला जे पटेल तेच विचार उचला! ". अर्थातच या चिकित्सेचा परंपरावाद्यांना, कर्मठ लोकांना त्रासच होणार होता! साॅक्रेटीसला तुरूंगात डांबून विष देऊन जसे मारले कारण तो धर्मगुरुंना, शासनाला प्रश्न विचारत असे. तसं करण्यासाठी लोकांनाही प्रेरित करत असे. हायपेशीयाच्या बाबतीतही थोड्याफार फरकाने हेच घडलं. धर्माची चिकित्सा करते म्हणून ख्रिस्ती आक्रमकांनी तिला मारून टाकले. ख्रिस्ती लोकांनी अलेक्झांड्रीयावर आक्रमण करून तिथल्या महाकाय ग्रंथालयाला, संग्रहालयाला जाळूण टाकले. अपोलोनिअसच्या काळात एलिप्स, हायपरबोला, पॅराबोला, या कोनिक्स चा शोध लागला. शंकुचे विविध कोणातून छेद घेतले असता हे आकार तयार होतात. सूर्य पृथ्वी भोवती फिरतो का, पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा प्रश्न जर आज आपल्याला कुणी विचारला तर तो किती हास्यास्पद ठरेल! पण हाच प्रश्न घेऊन दोन हजार वर्षे मागे वळून पाहिलं तर या प्रश्नाच्या उत्तराचा इतिहास हा किती रक्तरंजित आहे हे समजेल.  या एका प्रश्नाच्या उत्तरादाखल हजारो लाखो लोकांचे मुंडके धडावेगळे झाले आहेत. कारण या प्रश्नांच्या उत्तराने धर्मगुरू(?) यांच्या स्थानाला धक्का लागणार होता. तर हा सर्व संघर्ष ज्या काळात सुरु होता त्यावेळी अलेक्झांड्रीयात हायपेशिया 'निओप्लेटाॅनीक' तत्वज्ञान शिकवत होती. लोकांना गणित, तत्वज्ञान, खगोलशास्त्राचे धडे देत होती. 

     ख्रिस्तजन्मानंतर पहिल्या चार शतकात ख्रिस्ती धर्माचा उदय तसेच त्याचा फार आक्रमक धर्मप्रचारही झाला. ज्यू धर्मापासून फारकत घेऊन त्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला होता. हायपेशिया ही अलेक्झांड्रीयाच्या विद्यार्थ्यांमध्ये आणि एकूणच तिथल्या लोकांमध्ये एक विदूषी म्हणून मान्यता पावली गेली होती. त्याकाळी बहुतेकांची ख्रिस्ती धर्माला धर्म म्हणून मान्यता नव्हती. पण चौथ्या शतकातील काॅन्स्टनटाइन पहिला व दुसरा यांनी मात्र ख्रिस्ती धर्माला पाठबळ दिले आपली सत्ता मजबूत रहावी याकरता. काॅन्स्टनटाइन यांच्या या झुकत्या मापामुळेच धर्माला राजसत्तेचा वरदहस्त लाभला. 'पेगन' (अलेक्झांड्रीयातील स्थानिक लोक) लोकांचा कोणता असा एक धर्म नव्हता. त्यांची ज्ञान भांडारे, देवळे उध्वस्त करण्याचा निर्णय रोमन राजाने घेतला. अलेक्झांड्रीयाचा तत्कालीन बिशप थिओफिलस याला हायपेशिया बद्दल आदर होता पण त्याच्या पश्चात बिशप झालेला सिरिल याला मात्र हायपेशियाचं हे ज्ञान सत्तेच्या सिंहासनावर आरुढ असणं पचनी पडत नव्हतं. सिरिल हा सुद्धा सत्ताकांक्षी होता. त्याने धर्मप्रसार अजुनच आक्रमक पद्धतीने राबवायला सुरुवात केली. ज्याला धर्मग्रंथात सांगितलेलं मान्य नाही त्याची हत्या करण्याचे तो फर्मान सोडत असे. त्यासाठी त्याला धर्माचे अधिष्ठानही देत असे. आणि सिरिलच्या या मार्गात अडथळा ठरत होती हायपेशिया. शेवटी तिला हडळ (Witch) ठरवून चर्च मध्ये फरफटत नेऊन तिची कातडी सोलून मारून टाकले गेले. या चित्रपटात मला एक डायलाॅग फार आवडला. एके ठिकाणी हायपेशिया म्हणते की, " I believe in philosophy!" एक भारतीय तत्वज्ञ म्हणाले होते की, "Philosophy is a science of reality!" 


किती खरे आहे हे! सुदैवाने भारतीय इतिहास हा असा धर्म आणि विज्ञानाच्या संघर्षाने रक्तरंजित नाहीये. इथे जाती धर्माचे तंटे बखेडे नक्कीच आहेत. पण इतका मोठा रक्तपात मात्र आपल्याकडे झालेला नाहीये. लोकसत्ताच्या दिवाळी अंकातील "हायपेशिया!" हा लेख वाचा आणि त्यानंतर Agora हा सिनेमाही आवर्जुन वाचा. या चित्रपटाच्या पार्श्व संगीतात वाजत असणारा करुण स्वर हा ब्रॅड पिटच्या ट्राॅय या सिनेमामधल्या करुण संगीताची आठवण करून देतो.

अजिंक्य कुलकर्णी 

Comments

  1. Replies
    1. नावीन्यपूर्ण माहिती... सुंदर लेख

      Delete
  2. खुप माहीतीपुर्ण लेख. "सुदैवाने भारताच्या इतिहासात हा असा धर्म आणि विज्ञानाचा रक्तरंजित इतिहास नाहीये" असं आपण लेखात म्हटलंय..ह्याचं प्रमुख कारण म्हणजे " धर्म आणि विज्ञान " भारतामध्ये खुप कमी वेळेला एकमेकांसमोर आले..आणि त्याची किंमत भारत अजुनही चुकवित आहेच...युरोपमध्ये धर्म आणि विज्ञान वेळोवेळी एकमेकांसमोर ऊभे ठाकल्याने दोन्ही क्षेत्रांना फायदा झाला...

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks दानियल. काही अंशी खरं हे खरं आहे. पण भारतीयांची सर्व विचार सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे धर्म आणि विज्ञान यात संघर्ष होऊ शकला नाही असं मला वाटतं.

      Delete
  3. Kuthe baghayla milel...on which ott platform

    ReplyDelete
    Replies
    1. Ott वर कुठेच नाहीये उपलब्ध तो. नाही मिळाल्यास देतो मी तुला.

      Delete
  4. उत्तम लेख. नवीन माहिती वाचायला मिळाली. युरोपात हा धर्म विरुद्ध विज्ञान संघर्ष फार टोकाला गेला. त्यातही स्त्रियांचे स्थान दुय्य्म राहिलं. ठेवलं गेलं. त्या मानाने भारतात विदुषी स्त्रियांना जास्त चांगला आदर, सन्मान मिळाला. अनेक स्त्री संत होऊन गेल्या आणि विदुषी सुद्धा. त्यांना विरोध नक्कीच सहन करावा लागला परंतु पाठिंबाही मिळाला.

    ReplyDelete
  5. प्रत्येक वेळी नवीन विषय वाचायला मिळतो...Agora नक्की पाहीन.

    ReplyDelete
  6. वाह! आपल्या लेखणीतून अनेकानेक जागतिक किर्तीची चरित्रे आम्हास वाचावयास मिळतात. आम्हांसारख्या अवाचक रसिकांना(?) 😊आपली लेखणी थोडक्यात चरित्र समजावण्यात यशस्वी होते हे नक्कीच. आपले लेखन उत्तरोत्तर आम्हास प्रेरणा देवो...💐👍

    ReplyDelete
  7. Very nice information Agora...thx for sharing

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदरपणे माहितीपूर्ण लेख 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनुष्य गौरव दिन!

रेणुका देवी यात्रोत्सव - अस्तगाव

विज्ञानव्रती एच.सी.वर्मा