'इंडिका' - भारताच्या भूगोलाची कहाणी !
अभ्यासाची फार मोठी अशी एक परंपरा सर्वत्र पहायला मिळते. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांपासून भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे दाखले सापडतात. या भूगोलाच्या अभ्यासाला गती प्राप्त झाली ती कार्टोग्राफी म्हणजे नकाशा तयार करण्याचे तंत्र शोधल्यामुळे. आधुनिक काळात उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाईट टेक्नॉलॉजी), जीपीएस या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात वापर मोठा आहे. सध्या भौगोलिक इतिहास हा शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यापुरताच मर्यादित झाला आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन जर पाहिलं तर काही पुस्तके अशी असतात जी भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. असंच एक पुस्तक म्हणजे प्रणय लाल लिखित व नंदा खरे अनुवादित 'इंडिका' हे होय. मधुश्री प्रकाशन ने हे प्रकाशित केलं आहे.
इंडिका हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणात विभागले गेलेलं आहे. पृथ्वीच्या निर्मिती पासून ते थेट आजच्या प्रगत अशा होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांती पर्यंत ते येऊन थांबतं. भौगोलिक इतिहासात एक सर्वात महत्वाची पायरी असते ती म्हणजे कालमापनची. त्यात हे कालमापनाचे आकडे भयंकर मोठे असतात. त्या ऐवजी पृथ्वीचा ४६० कोटी वर्षे वयाला ४६ वर्ष वयाच्या स्त्रिचं रूपक योजल्यामुळे आकड्यांच्या जंजाळातून सुटका होते आणि समजायलाही ते जरा सोपं जातं. पृथ्वी आणि चंद्राच्या आयुष्यातली सुरुवातीची दोन अब्ज वर्ष त्यावर सतत उल्काच आपटत होत्या. या उल्कापातामुळेच पृथ्वीला हिरे, पाणी, सोनं वगैरे अनेक खनिजे मिळाली. पुढे सूर्याच्या गुरूत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली. वातावरणातील आॅक्सिजन वाढू लागला सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे आॅक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होऊ लागले आणि ओझोनमुळे परत सूर्याची अतिनिल किरणे अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडायला सुरुवात होऊ लागली. आॅक्सिजन व कार्बन संयोग पावल्याने कार्बनडायअाॅक्साईड तयार होऊ लागला.
शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सुरूवातीला बारा खनिजे होती. सूर्याभोवतीही हिच बारा खनिजे होती. सूर्याच्या उष्णतेने पृथ्वीवर भूरासायनीक क्रिया सुरु होऊन इतर खनिजांची निर्मिती झाली. काळाच्या पटलावर पटपट पुढे सरकत आपण थेट एकपेशीय सजीवांच्या निर्मितीपर्यंत आलो तर असे लक्षात येते की, या एकपेशीय सजिवांच्या शरीररचना उलट जास्त क्लिष्ट असतात. मायटोकाॅन्ड्रीया ज्याला 'पाॅवरहाऊस आॅफ सेल' असं म्हटलं जातं त्याची निर्मिती एकपेशीय सजीवात कशी झाली ? पृथ्वीच्या आयुष्यात मग आल्या बुरश्या परंतु त्यांनी अगदी थोड्या काळापुरते वनस्पतींना मागे टाकले होते.
भारतीय उपखंडात एक पेशीय सजीव कसे तयार झाले? त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? सागरात प्राण्यांची जशी स्पोटक अशी निर्मिती झाली तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशाप्रकारे झाली? भारतीय उपखंडातील सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला इंडीकात वाचायला मिळतो. काही अद्भुत गोष्टीही यात वाचायला मिळतात उदा. कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याकडे आढळत होते ? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? तर.. काही माशांमध्ये शारीरिक बदल कसे झाले? छोट्या माशांनी मोठ्या माशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काही शारीरिक बदल केले. त्यातल्या Cypselurus प्रजातींचे मासे तर चक्क समुद्रापासून काही फूट उंच उडू शकतात. Lobe fish प्रकारातील मासे मात्र आज जवळपास नष्ट झालेले आहेत. भारतीय उपखंडातील जीवाष्म अभ्यास दाखवतो की सूर्यस्नान करणाऱ्या जीवनामध्ये हळूहळू मानेचे हाड व कवटी यांच्यातला सांधा बदलून तो लवचीक झाला आणि मान डावी-उजवीकडे वळवणे शक्य होऊ लागले. याचा फायदा पाण्यात वावरताना भक्ष्य पकडणे, अन्न चावणे, गिळणे या क्रिया सोप्या होऊ लागल्या. अकरावी बारावी सायन्सच्या बायलॉजी विषयाच्या अभ्यासक्रमात फर्न (नेचे), सायकॅड या वनस्पतींचा समावेश आहे. मला व्यक्तीशः अकरावी-बारावीत त्या वनस्पतींचा अभ्यास करायचा फार कंटाळा यायचा. मला त्याही वेळेला हा प्रश्न पडायचा की मी का करायचा या वनस्पतींचा अभ्यास ? इंडिका वाचल्यावर लक्षात येते गोष्ट की, पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा जेव्हा 80 - 90° सेल्सियसपर्यंत गेले होते त्यावेळीही फर्न व सायकॅड यांचे बी मातीआड तग धरून राहिलेली आहेत. पृथ्वीवर वने रुजवण्यात या दोन वनस्पतींचा सिंहाचा वाटा आहे.
'प्राणी मोठे आणि अजस्त्र' आणि 'भारत नावाचे बेट' या दोन प्रकरणात भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपूर्वी कसा तयार झाला ? भारतात कोणकोणत्या प्रकारच्या डायनासाॅर्सचे वास्तव्य होते? त्यांचे जीवाश्म कुठे कुठे सापडले आहे आहेत? गोंडवाना प्रदेश (मादगास्कर, ऑस्ट्रेलिया, भारत) यांपासून भारत हा वेगळा कसा झाला, भारताची निर्मिती कशी होत गेली? भारतीय उपखंडात हिमालय पर्वत कसा तयार झाला?याच्या म्हटल्या तर चित्तथरारक गोष्टी वाचायला मिळतात. नंतरच्या काळात डायनॉसॉरस कशाप्रकारे नष्ट झाली. गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्याचा वेग हा भारताचा इतरांच्या तुलनेत सर्वात जास्त होता. सुरतवातीला हा वेगळं होण्याचा वेग साधारणपणे आठ सेंटीमीटर प्रति वर्ष इतका जास्त होता. इतरांच्या तुलनेत हा नक्कीच जास्त होता.अस्मानी संकटामुळे डायनासोर नष्ट झाले. सोळा कोटी वर्ष या डायनोंनी या पृथ्वीतलावर राज्य केलं. भारतात सापडणाऱ्या डायनोंबद्दल बद्दल वाचताना वाटतं की, इतका मोठा भोगोलिक वारसा आपल्याकडे असताना शालेय अभ्यासक्रमात सातासमुद्रापलीकडे असणारे टुंड्रा प्रदेशात तांदूळ पिकतो का गहू हे का शिकवतात? त्याऐवजी भारतातील पुरातत्वांचा हा खजिना का उघडून दाखवला जात नाही मुलांना? अंटार्टिका वर जेवढा जास्त बर्फ जमा होईल तेवढा भारतात पाऊस कमी पडतो. त्याचे एक महत्वाचं कारण म्हणजे अंटार्टिकावर जितका कमी बर्फ जमा होईल तेवढ्या जास्त क्षेत्रावरच्या पाण्याची वाफ होते. परिणामी भारतात मान्सून जास्त सुधारतो.
भारतातील नद्यांचा उगम कुठे कसा झाला? त्यात कोणकोणते बदल झाले, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा, आमच्या नगर जिल्ह्यातील नेवाशाला सापडलेली पुरातन हत्यारे याचा इतिहास वाचताना नकळत मराठी माणूस म्हणून मी सुखावून गेलो होतो. पुस्तकात तांत्रिक माहिती व शास्त्रीय शब्दांची रेलचेल आहे. जर ही माहिती वाचायला नोकशी वाटली तर आपण काही पाने ओलांडून आपण पुढे वाचू शकतो त्यांने वाचनात कोणताही रसभंग होत नाही. अनुवादात मुद्रितशोधनाच्या बर्याच चुका झालेल्या आहेत जसे की डीएनए हा शब्द डिएने असा तर चेन्नई शब्द चन्नै असा छापला गेला आहे. नकाशांखाली भाराताचा उल्लेख करताना पिवळी चांदणी असा केला आहे आणि नकाशात प्रत्यक्षात ती दिसत नाही. त्यामुळे नकाशा वाचनात थोडी अडचण येते. या चुका सोडल्यास पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनीय नक्कीच आहे.
पुस्तक :- इंडिका
मुळ ले:- प्रणय लाल
अनुवाद :- नंदा खरे
प्रकाशन :- मधुश्री पब्लिकेशन
किंमत :- ६००₹
अजिंक्य कुलकर्णी
Comments
Post a Comment